पुन्हा एकदा महागाईने डोके वर काढले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांच्या स्वयंपाक घरावर झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडर दरात तब्बल पन्नास रुपये वाढ झाल्यामुळे आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या कुटुंबासमोर चूल पेटवणेही आता मोठे आव्हान बनले आहे. गावाकडील भागात पूर्वी लाकूड फाट्यावर स्वयंपाक करून आपला दिवस चालणाऱ्या कुटुंबासाठी ही पर्याय संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे वनविभागाचे निर्बंध आणि पर्यावरण नियमामुळे लाकूड गोळा करणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे उज्वला योजनेतून मिळणाऱ्या गॅसवरही दरवाढ झाल्याने ती योजना देखील आता परवडत नाही.
यामुळे स्वयंपाकासाठी कोणताही पर्याय सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. गेल्या काही दिवसापासून प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरासरी 50 रुपयाची वाढ झाली आहे. उज्वला योजनेतून मिळणाऱ्या सिलेंडरची किंमत 503 वरून 553 रुपयावर पोहोचली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी दोन रुपयाची वाढ केली असून पेट्रोलवर एकूण 13 रुपये तर डिझेलवर दहा रुपये शुल्क आकारले जात आहे. मात्र सरकारचा दावा आहे की या दर वाढीचा थेट परिणाम ग्राहकावर होणार नाही. दुसरीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर सध्या पंधरा टक्के घसरून सुमारे 63 डॉलर प्रति बॅलरवर पोहोचले असतानाही देशांतर्गत दर वाढवले जात असल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.
सरकारचे म्हणणे आहे की तेल कंपन्यांनी मागील काळात केलेल्या तोट्याची भरपाई करण्यासाठी हे दरवाढ तात्पुरती असून लवकरच पुनर्विचार केला जाईल. मात्र, नागरिकांच्या दृष्टीने ही तात्पुरती दरवाढ देखील त्रासदायक ठरत असून जगणेच महाग झाले आहे. असी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. एका बाजूला महागाई, दुसऱ्या बाजूला बेरोजगारी आणि आता गॅस सारख्या अत्यावश्यक सेवांचा खर्च वाढल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबासमोर संकट उभे राहिले आहे.
